Ratnagiri: सकाळी कामाला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही, अपहरण झाल्याची वडिलांची फिर्याद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:33 IST2025-06-10T15:33:26+5:302025-06-10T15:33:49+5:30
रत्नागिरी : शहरातील धनजीनाका परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात कामाला असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी ...

Ratnagiri: सकाळी कामाला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही, अपहरण झाल्याची वडिलांची फिर्याद
रत्नागिरी : शहरातील धनजीनाका परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात कामाला असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेनंतर रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुरुगवाडा येथील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. तिच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय असून, त्यांची मुलगी ही धनजीनाका येथील नाॅव्हेल्टी दुकानात कामाला आहे. ती रविवारी सकाळी ९ वाजता दररोजप्रमाणे दुकानात कामावर गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांना काळजी वाटू लागली.
त्यामुळे तिच्या वडिलांनी दुकान मालकाशी संपर्क साधला. त्यांनी दुपारी २ वाजता मुलगी दुकानातून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एसटी स्टँड परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
आपल्या मुलीला काेणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून त्यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.