रत्नागिरीतील सीसीटीव्ही बंद, कंपनी संचालकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:11 IST2025-12-26T16:11:01+5:302025-12-26T16:11:29+5:30
शासनाची ४३ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाेन संचालकांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल

संग्रहित छाया
रत्नागिरी : शहरात ‘रत्नागिरी सिटी सर्व्हेलियन्स’ प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे बसविणाऱ्या कंपनीने अटी व शर्थींचा भंग करून शासनाची ४३ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाेन संचालकांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाेलिस अधीक्षक कार्यालयातील पाेलिस दळवणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पाेलिस निरीक्षक उमेश आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्राेटाेकाेल वन इट लॅब्स प्रा. लि. कंपनीचे संचालक हेमंत गाेपाळ थवानी व कुलदीप एराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या मुदतीत पाेलिस दलातर्फे शहरात ‘रत्नागिरी सिटी सर्व्हेलियन्स’ प्रकल्पांतर्गत सीसीटी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची देखभाल करणे, पुरवठा आदेशाप्रमाणे कामकाजाची पूर्तता करण्याची जबाबदारी प्राेटाेकाेल वन इट लॅब्स प्रा. लि. कंपनीकडे आहे.
मात्र, कंपनीच्या दाेन संचालकांनी अटी व शर्थींचा भंग करून शासनाची एकूण ४३,३५,००० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी दाेघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (२), ३१८ (३), २२१, २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.