Ratnagiri: खान केमिकल कंपनीतील स्फोटामधील आणखी एका जखमीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:17 IST2026-03-18T17:15:49+5:302026-03-18T17:17:02+5:30
दुर्घटनेत एकूण ११ कामगार जखमी, आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू

Ratnagiri: खान केमिकल कंपनीतील स्फोटामधील आणखी एका जखमीचा मृत्यू
आवाशी (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डाॅ. खान केमिकल कंपनीत झालेल्या स्फाेटातील गंभीर जखमी झालेल्या सहा कामगारांपैकी आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान साेमवारी (१६ मार्च) मृत्यू झाला. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. बंगाल, सध्या रा. आवाशी, खेड) असे त्याचे नाव आहे. आत्तापर्यंत या स्फाेटातील तिघांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत ६ मार्च रोजी उत्पादन प्रक्रिया सुरू करतानाच रिॲक्टरचा स्फाेट झाला हाेता. या स्फाेटामुळे गरम रसायन कामगारांच्या अंगावर उडाले हाेते. त्याचबराेबर छप्पर तुटून खाली पडल्याने कामगार जखमी झाले हाेते. या दुर्घटनेत एकूण ११ कामगार जखमी झाले हाेते.
त्यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ऐरोली (नवी मुंबई) येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या खेड तालुक्यातील मुरडे गावातील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) या कामगाराचा ११ मार्च रोजी मृत्यू झाला हाेता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (१२ मार्च) असद खान या लातूर येथील कामगाराचा मृत्यू झाला.
त्यानंतर उर्वरित चार कामगारांपैकी सुजन दास याचा १६ मार्च राेजी मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी आवाशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.