पेरणीची लगबग, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST2025-06-13T16:32:38+5:302025-06-13T16:33:13+5:30
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी ...

संग्रहित छाया
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते; मात्र तत्पूर्वी लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी पेरणी केली जाते.
सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे सुरू आहेत. पारंपरिक नांगर; तसेच पाॅवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी केली जात आहे; मात्र पाणथळ जमिनीत नांगरणी न करता कुदळीचा वापर करून खणून पेरणी करण्यात येत आहे. पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी रोपे काढून लागवड केली जाते. त्यासाठी लागवड केलेल्या क्षेत्राची नांगरणी करून चिखल केला जातो.
खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जात असल्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना रोपांची उगवण व योग्य पद्धतीने वाढ महत्त्वपूर्ण आहे. पेरणी पूर्ण झालेले शेतकरी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहावे, तण उगवू नये, यासाठी नांगरणी करून ठेवत आहेत.
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र
तालुका - पेरणी क्षेत्र
- मंडणगड - १६५.२
- दापोली - ४६२.२
- खेड - २७३.२
- चिपळूण - ४४४.७१
- गुहागर - १११.२३
- संगमेश्वर -३५४.२
- रत्नागिरी - २१०.६२
- लांजा -२४२.२
- राजापूर -२७८.२
- एकूण -२५४१.७६