रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा १ कोटी ७८ लाख रूपयांचा राष्ट्रीय संशोधन प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:32+5:302021-07-03T04:20:32+5:30

रत्नागिरी : नजिकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांच्या १ ...

1 crore 78 lakh National Research Project of Fisheries College at Ratnagiri approved | रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा १ कोटी ७८ लाख रूपयांचा राष्ट्रीय संशोधन प्रकल्प मंजूर

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा १ कोटी ७८ लाख रूपयांचा राष्ट्रीय संशोधन प्रकल्प मंजूर

रत्नागिरी : नजिकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांच्या १ कोटी ७८ लाख रूपयांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

महाराष्ट्र राज्याला गोडे, निमखारे आणि खारे पाणी असे तिन्ही प्रकारचे जलस्रोत उपलब्ध असून, निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. या नैसर्गिक संपत्तीचे सुयोग्य नियोजन करुन मत्स्यव्यवसायाद्वारे उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाची गरज आहे. राज्यात नैसर्गिक तलाव, तळी, पाझर तलाव, पाटबंधारे तलाव यांचे क्षेत्र ३ लाख हेक्‍टर आणि नद्यांचे जलक्षेत्र १९,००० किलोमीटर एवढे आहे. यापैकी काही जलक्षेत्र मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत तर उर्वरित जलक्षेत्रातून मिळणारे मत्स्योत्पादन खूपच कमी आहे. अशा दुर्लक्षित जलस्रोत/जलाशयात जर शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन केले तर नक्कीच राज्याच्या मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राज्यातील ग्रामीण युवकांनी अशा दुर्लक्षित जलाशयात लोकसमुदायातून मत्स्यसंवर्धन केले तर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून ग्रामीण जीवन उंचावण्यास मदत होईल.

याच उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, प्राध्यापक डॉ. बी. आर. चव्हाण यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्याकडे ‘महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहातील लोकांच्या अन्नसुरक्षा आणि त्यांचे ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानावर आधारित संशोधन आणि विकास पथदर्शी प्रकल्प’ राष्ट्रीय पातळीवर सादर केला होता. हा प्रकल्प मंजूर झाला असून, त्यासाठी १ कोटी ७८ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

हा प्रकल्प हा तीन वर्षांकरिता २०२१-२०२२ या आर्थिक वर्षापासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक, डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे तसेच मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे आणि विभागप्रमुख सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांच्यामार्फत राबविला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. राहुल सदावर्ते, डॉ. हरिष धमगाये आणि कृषी विज्ञान केंद्र, लांजाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हणमंते, डॉ. संदीप पाटील प्रकल्प उपप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराची दिशा...

या प्रकल्पांतर्गत जलाशयामध्ये पिंजऱ्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरून शास्त्रीय पद्धतीने मत्स्य संवर्धन करण्यात येणार आहे आणि म्हणूनच हा प्रकल्प ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराची एक नवी दिशा देऊ शकेल. या प्रकल्पाकरिता १,७८,९१,४३८ रूपये मंजूर झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अशाप्रकारचा पहिलाच संशोधन प्रकल्प आहे. कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहातील लोकांची अन्नसुरक्षा आणि त्यांचे ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा संशोधन आणि विकास पथदर्शी प्रकल्प दीपस्तंभ ठरणार आहे.

- डाॅ. प्रकाश शिंगारे, अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी

Web Title: 1 crore 78 lakh National Research Project of Fisheries College at Ratnagiri approved