मुंबई - आयपीएलमध्ये यंदा सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. ड्रेसिंग रूममध्ये संघाला कठोर संदेश देताना ३२ वर्षांचा हार्दिक म्हणाला, ‘आता दोनच उपलब्ध पर्याय आहेत. एकतर पराभवांमधून धडा घेत पुढे जाणे किंवा एकटे पडून राहणे!’
बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या संवादादरम्यान कठोर वास्तव समोर मांडताना हार्दिकने मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला. तो म्हणाला, माहेलाने सांगितल्यानुसार आपल्या समोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे आपापल्या खोल्यांत परत जाऊन, आपल्या कवचात राहून उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे. मला माहीत आहे, पराभव कठीण असतो; पण आपण गायब होऊ नये. शिकत राहूया. सामना झाल्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यावर आपण सगळे मिळून जेवूया, क्रिकेटबद्दल बोलूया, इतर गोष्टींबद्दलही बोलूया; पण एकत्रितपणे मार्ग काढूया.’
गोलंदाजांवर नाराजी
पत्रकार परिषदेतही हार्दिकने गोलंदाजीबाबत निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मला वाटते आम्ही खूप धावा दिल्या. २४१ धावांचे लक्ष्य गाठणे नेहमी कठीण असते. खेळावर नियंत्रण ठेवण्याऐवजी सतत पाठलाग करीत आहोत. आपण काय सुधारणा करू शकतो, गती कशी मिळवू शकतो, याचा गंभीर विचार करायला हवा.’ रविचंद्रन अश्विनने हार्दिकच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवले. तो म्हणाला, ‘रजत पाटीदार फलंदाजीला असताना मयंक मार्कंडेयला गोलंदाजी करायला आणणे चुकीचे होते.’
रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत; स्कॅनही झाले
आयपीएल सामन्यात बंगळुरू संघाविरुद्ध रोहित शर्मा बराच काळ मैदानाबाहेर होता. फिजिओकडून उपचार घेतल्यांनतरही त्याला मैदान सोडावे लागले. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे समजते. यात मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू जास्त ताणले गेल्याने धावताना किंवा अचानक वेग कमी करताना तीव्र वेदना होतात. पुढील सामन्यात त्याचा सहभाग स्कॅनच्या अहवालावर अवलंबून आहे. मुंबईचा सामना १६ एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध असेल. ३८ वर्षांच्या रोहितने १३ चेंडूत १९ धावा केल्यानंतर सहाव्या षटकात मैदान सोडले होते. मुंबई संघाने याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.