Rajasthan Accident: भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:18 IST2026-02-11T11:16:33+5:302026-02-11T11:18:43+5:30
rajasthan dausa car accident: राजस्थानच्या दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग २१ वर एक भीषण अपघात झाला. लग्न आटोपून घरी परतणाऱ्या ६ मित्रांच्या कारला भीषण अपघात झाला आणि सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला.

Rajasthan Accident: भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप
राजस्थानच्या दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग २१ वर मंगळवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली. कैलाई बस स्टँडजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व तरुण एका लग्न समारंभातून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. कारलकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण कारने आपल्या गावाकडे परतत होते. कैलाई बस स्टँडजवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि ती वेगाने डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर कार उलटली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला.
पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह स्थानिक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नेमका अपघात कशामुळे झाला? याचे कारण शोधले जात आहे.
'तो' फोटो ठरला शेवटचा
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अपघाताच्या अवघ्या ३० मिनिटांपूर्वी या सहाही मित्रांनी लग्न समारंभात हसत-खेळत एकत्र फोटो काढले होते. ते फोटो त्यांच्या आयुष्यातील शेवटचे फोटो ठरतील याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण कालाखोह गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत तरुण सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरातील कालाखोह येथील रहिवासी होते.