१२व्या वर्षी लादलेले लग्न, १० वर्षांनी रद्द; जोधपूर कुटुंब न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 06:04 IST2026-03-23T06:03:36+5:302026-03-23T06:04:30+5:30
२०१६ मध्ये अवघ्या १२ वर्षांची आणि सातवीत शिकत असताना बिष्णोई समाजातील बुरसट रूढीनुसार विवाह लावून देण्यात आला होता.

१२व्या वर्षी लादलेले लग्न, १० वर्षांनी रद्द; जोधपूर कुटुंब न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
जोधपूर : जोधपूर येथील एका तरुणीने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदेशीर लढाई जिंकली आहे. वयाच्या १२व्या वर्षी लादले गेलेले लग्नाचे बंधन तब्बल दहा वर्षांनंतर कौटुंबिक न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे.
न्यायालयाने हा विवाह’बालविवाह प्रतिबंधक कायद्या’नुसार निरर्थक ठरवत बालविवाह हा मुलांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करतो असे निरीक्षण नोंदवले आहे.
हाती धरणार पुस्तक
सातवीनंतर शिक्षण सुटलेली खुशबू आता मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा देणार आहे. ‘स्वावलंबी होणे, हेच आता माझे आणि माझ्या मोठ्या बहिणीचे स्वप्न आहे,’ अशा शब्दांत खुशबूने आपला आनंद व्यक्त केला.
जुनाट रुढीनुसार केवळ १२ वर्षांची असतानाच विवाह: २०१६ मध्ये खुशबू अवघ्या १२ वर्षांची आणि सातवीत शिकत असताना बिष्णोई समाजातील बुरसट रूढीनुसार तिचा विवाह लावून देण्यात आला होता. कुटुंबातील एका मृत्युपश्चात होणाऱ्या ‘मौसर’ (मृत्युभोज) या विधीचा भाग म्हणून सामूहिक विवाह सोहळ्यात तिचा विवाह झाला होता. लहान असल्याने खुशबूला वैवाहिक सौख्य, विवाहाचा अर्थही समजत नव्हता. मात्र, खुशबू वयाने मोठी झाल्यावर सासरच्या मंडळींनी एकत्र राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने मनाचा निश्चय करत या नात्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला.