'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:38 IST2025-06-07T14:38:08+5:302025-06-07T14:38:59+5:30
Maharashtra Politics: सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असा सुप्त राजकीय संघर्ष महायुतीमध्ये कोकणात दिसत आहे. भरत गोगावले यांच्यानंतर आता महेंद्र थोरवेंनीही तटकरेंवर घणाघाती टीका केली.

'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
Shiv Sena NCP News: 'लोकसभेला शिवसेनेच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे तटकरेंना मदत केली, पण विधानसभेला प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं. खरंतर राजीनामा आम्ही नाही, तुमच्या नेत्याने (सुनील तटकरे) नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे', अशा शब्दात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रायगडमध्ये आयोजित शिवसेनेच्या एका कार्यक्रमात कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंवर सडकून टीका केली. त्यामुळे कोकणामध्ये महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाची तीव्रता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तटकरेंनी राजीनामा दिला, तर मी सुद्धा देईन
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, "तुमच्या नेत्याने (सुनील तटकरे) राजीनामा दिला, तर मी नक्कीच देईन. माझी द्यायची तयारी आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊद्या. तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे राजीनामा द्यायची, तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या. त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरं जाईन. तयारी आहे का, जाऊन विचारा", अशी टीका महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केली.
वाचा >>राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
"पत्रकार परिषद घेतात. कोल्ह्या कुत्र्यांची पत्रकार परिषद. आम्ही खूप काही शांत पद्धतीने सहन करत आलेलो आहे. बदनामी... किती बदनामीला सामोरं जाणार? तोंडात येईल ते बोलत आहेत. मनाला वाटेल ते पत्रकार परिषदेत जाऊन बोलत असतात. आता पत्रकारांनाही कळून चुकलं आहे की, या पलीकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही", अशा शब्दात आमदार थोरवेंनी तटकरेंना लक्ष्य केले.
"पराभव हा पराभव असतो. त्यामुळे तो शांतपणे स्वीकारा. ज्या ज्या ठिकाणी चुका झाल्या, त्याचे आत्मचिंतन करा. मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो", असेही थोरवे म्हणाले.