उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार
By प्रशांत बिडवे | Updated: June 2, 2023 17:32 IST2023-06-02T17:32:45+5:302023-06-02T17:32:57+5:30
परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत

उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याप्रकरणी ११६ तर परीक्षेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याबाबत २ प्रकरणांची नाेंद झाली आहे. राज्यात परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर असे एकूण ३६६ गैरप्रकार घडले आहेत.
परीक्षेदरम्यान काॅपी करणे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य करणे, डमी विद्यार्थी परीक्षेस बसविणे, वर्गातील परीक्षकांना धमकी देणे यासह परीक्षेनंतर उत्तरपत्रिका फाडणे, ओळख पटावी यासाठी उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे अथवा विशिष्ट खूण करणे आदी गैरप्रकार घडत असतात. काॅपी केल्याची सर्वाधिक ३३ प्रकरणे नाशिक विभागीय मंडळात घडले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ३०, नागपूर २६, पुणे १४, लातूर ८, अमरावती ४, मुंबई १ तसेच काेल्हापूर आणि काेकण विभागात एकही काॅपी प्रकरणाची नाेंद झाली नाही. परीक्षेदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याप्रकरणी पुणे आणि नागपूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक प्रकार घडला आहे.
गैरप्रकारात छत्रपती संभाजीनगर विभाग अग्रेसर
परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत. त्यानंतर पुणे ४२, नाशिक ३७, मुंबई ३१, लातूर २३, अमरावती २२, नागपूर १०, काेल्हापूर ८, काेकण २ असे एकूण २४८ गैरप्रकारांची नाेंद झाली आहे.