ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:08 IST2026-02-07T19:08:01+5:302026-02-07T19:08:45+5:30
कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिली मात्र शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात कृष्णा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला.

ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना
नसरापूर : ऊसतोड मजुराच्या ५ वर्षांच्या मुलावर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना केंजळ (ता. भोर) येथे उघडकीस आली. ही घटना आज (दि. ७) सकाळी नऊ वाजता घडली असून, वन विभागाने वन्य प्राण्याचा हल्ला नाकारत कुत्र्यानेच केला आहे असे सांगण्यात आले. राजगड पोलिसांनी घटनेची नोंद घेत पालकांचा जबाब नोंदवला असून, तपास सुरू आहे. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
चाळीसगाव येथील कृष्णा किरण सोनवणे (वय ५) हे बालक आज सकाळी आई-वडिलांसह केंजळ येथील ऊस फडात कामासाठी गेले होते. कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात कृष्णा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. भोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
वन विभागाचा स्पष्ट खुलासा
सदर मुलाच्या अंगावरील जखमा वन्य प्राण्याच्या नसून कुत्र्याने केलेल्या आहेत. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्याचे पायाचे ठसे निदर्शनास आले. तसेच उपस्थित ऊसतोड कामगारांकडून माहिती घेतली असता त्यांनीही कुत्र्याने हल्ला केल्याचे सांगितले. बिबट्याचा किंवा इतर वन्य प्राण्याचा हल्ला झालेला नाही, असे नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. वन विभाग तपास पूर्ण करून अहवाल सादर करणार आहे. या घटनेने केंजळ आणि परिसरातील शेतकरी, मजूरांमध्ये भीती व हळहळीचे वातावरण आहे. ऊस फडांभोवती कुत्रे वावरतात, मजुरांच्या मुलांसाठी धोका आहे. प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.