निवडून आल्यावर लोककल्याणाचाच विचार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By राजू इनामदार | Updated: February 8, 2025 20:09 IST2025-02-08T20:09:32+5:302025-02-08T20:09:52+5:30
लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी

निवडून आल्यावर लोककल्याणाचाच विचार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : नेते असतात ते निवडून येतातच; पण निवडून आल्यानंतर कायम लोककल्याणाचा विचार व्हायला हवा. त्यासाठी अशी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी, असेही ते म्हणाले.
‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ यांच्या वतीने देशभरातील आमदारांसाठी दोनदिवसीय-क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे झाला. त्यात फडणवीस बोलत होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी, ‘एनएलसी भारत’चे संस्थापक-संयोजक डॉ. राहुल कराड, प्रा. परिमल माया सुधाकर, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन संदेश दिला. देशभरातून विविध राजकीय पक्षांचे २०० पेक्षा जास्त आमदार यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
गडकरी यांनी लोकशाही किंवा राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही असे सांगितले. समाजाचा विकास हे मूळ ध्येय आहे. गुणात्मक परिवर्तनानेच लोकशाही सक्षम होईल व त्यातूनच देश खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर जाईल, असेही गडकरी म्हणाले.
सुमित्रा महाजन यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्यात सुरुवातीपासून सहभागी होता आले याचा आनंद आहे. राजकारणात चांगल्या लोकांनी यायलाच हवे, आलेल्या लोकांनी आपल्या कामात सुधारणा करायलाच हवी, त्यासाठी अशा संमेलनांचा विचार होईल, असे महाजन म्हणाल्या. राम शिंदे, सतीश महाना यांचीही भाषणे झाली. घटनात्मक तरतुदींचा वापर व त्यातून जनकल्याण या पद्धतीने काम व्हावे, त्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी होईल, असेही त्यांनी सांगितले.
संयोजक डॉ. राहुल कराड यांनी प्रास्तविक केले. विकासाचे राजकारण व्हावे, त्यातून देशाची प्रगती व्हावी, राजकीय पक्षांचा विचार निवडणुकीपुरता व्हावा, ती झाल्यावर आपण देशाचे प्रतिनिधी ही भावना निवडून आलेल्यांमध्ये तयार व्हावी, यासाठी हे संमेलन आहे, असे ते म्हणाले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. लोकशाहीसाठी घंटानाद करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर विश्वशांती प्रार्थना झाली. आर्वी (वर्धा) विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार सुमित वानखडे हे ‘एमआयटी’चे माजी विद्यार्थी असून, त्यांचा फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.