पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:24 IST2026-02-05T15:11:14+5:302026-02-05T15:24:20+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले. राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आज खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात जय पवारांसोबत झालेल्या बैठकीत बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे स्मारकासाठी जागा निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर आमदार रोहित पवार यांनी बैठकीतील माहिती दिली.
सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार का?; नेमके झाले तरी काय?
या बैठकीत प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त देखील उपस्थित आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले, 28 तारखेला अजितदादांच्या विमान अपघाताची घटना घडली. अजित दादा प्रचारासाठी निघाले त्यावेळी ही घटना घडली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित दादा मोठे नेतृत्व होते, जिथं त्यांचे उमेदवार आहेत, तिथं लोकांनी सहकार्य करावे.
रोहित पवार म्हणाले, पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवार साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू ठरलेले आहेत, राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब यांचे कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा पवारसाहेब भक्कमपणे बरोबर उभे होते. अजित दादा देखील जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा परिवारासोबत उभे राहिलेले आहेत, आज दादा नसताना पवार साहेबांचा मार्गदर्शन जसं पूर्वी मिळत होतं तसंच आता सुद्धा ते मिळत आहे, जय पवार, पार्थ पवार, काकी आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातील कोणते विषय असतील, ट्रस्टचा विषय असेल हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत, सामाजिक आहेत आणि त्यात कुठेही राजकारण नाही ते सगळे त्यांच्यासमोर मांडतो.
"आमच्या सर्वांचच मत आहे की, चांगलं स्मारक अजितदादांच्या नावाचं तिथे असावं, त्यादृष्टीन जागा कोणती जिथे लोकांना येता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल आणि काकांचं काम हे 35-40 वर्षातील राजकारणाचं होतं, त्याबाबत त्यांचं म्युझियम देखील चांगल्या पद्धतीचं व्हावा अशी लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे, मग ते बारामती शहरांमध्ये असावं की दुसरीकडे कुठे असावं, याबाबतच्या सर्व चर्चा त्या ठिकाणी झाल्या आहेत, पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडून आणि त्या संस्था आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्या सर्व त्या संस्थेचे प्रमुखांनी, ट्रस्टी आहेत, त्यांच्याकडून पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल, असंही रोहित पवार म्हणाले.
९ तारखेनंतर या सगळ्यावर बोलणार
पवार म्हणाले, विमानात काय घडलं? कसं घडलं? हे सुद्धा नऊ तारखेनंतर स्पष्टपणे बोलता येईल, जी काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, काही माहिती आम्ही मागत आहोत, तर एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं, हे लोकांसमोर येणं फार महत्त्वाचं आहे आणि पवार परिवार म्हणून किंवा एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याचे योग्य उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे, असंही रोहित पवार म्हणाले.