आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार
By नितीन चौधरी | Updated: June 9, 2025 19:37 IST2025-06-09T19:37:16+5:302025-06-09T19:37:45+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवारांनी संभ्रम कायम ठेवला

आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार
पुणे : चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देखील आपले काम करत राहण्याचे ठरवले आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, अशा शब्दांत महायुतीत लढायचे की, स्वबळावर याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवार यांनी संभ्रम कायम ठेवला आहे. महापालिका निवडणुकांसाठी माझा चेहरा असेल असे बोलल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असे बोलावे लागते, असे ते म्हणाले.
व्हीएसआयमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मंगळवारी (दि. १०) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार नेमके काय बोलतील याबाबत उत्सुकता होती. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमचे नेते व मी चर्चा करून योग्य भूमिका मांडू, असे ते म्हणाले. महायुतीमधील काही सहकारी, कधी एकत्र निवडणुका लढवू तर कधी स्वबळावर निवडणुका लढवू, असे वक्तव्य करत आहेत. मात्र, याचा अंतिम निर्णय प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा आहे. मात्र, कुणाचे काय ठरेल, निवडणुका कधी होणार, कोण कुठे जाणार, हे त्या-त्या वेळी सांगितले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या दोन्ही पक्षांचे प्रथमच पुण्यात वर्धापन दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. याबाबत विचारले असता स्वतंत्र वर्धापन दिनावर या दोन्ही पक्षांचा दावा खरा आहे, असे सांगत पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत मला काही बोलायचे नाही. काय निर्णय घ्यायचे ते त्या-त्या पक्षाचे नेते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.
उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याबाबत ते दोघेच ठरवतील आणि जाहीरही करतील, असे सांगून पक्षाचे समर्थक पाठीराखे हितचिंतक यांना वाटते तसे बोलून दाखवले जाते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही गट एकत्र येतील याबाबतही तसेच सुरू झाले असून, एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारणे तुमचा अधिकार असला, तरी उत्तर देणे माझा अधिकार आहे. आता याबाबत उत्तर द्यायचे नाही, असे मी ठरविले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जातात, असेही ते म्हणाले.