Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?
By राजू इनामदार | Updated: June 14, 2025 20:30 IST2025-06-14T20:29:44+5:302025-06-14T20:30:58+5:30
नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा प्रचंड वाहतूककोंडी

Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?
पुणे: आठवड्यातील सुटीचे दिवस, चतूर्थी, गणेशजन्म अशा दिवशी छत्रपती शिवाजी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनपुणेकरांची सुटका व्हावी म्हणून प्रशासन काही करणार आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कसबा विभागाने यासंबधी महापालिका, वाहतूक शाखा यांना निवेदन देऊन आता काहीतरी करा अशी मागणी केली आहे.
या विभागाचे अध्यक्ष गणेश नलावडे यांनी सांगितले की, या रस्त्यावरून प्रवास करायचा, तोही शनिवार रविवार किंवा कोणत्याही सुटीच्या दिवशी व चतुर्थी व गणपतीशी संबधित दिवशी म्हणजे निव्वळ कसरत झाली आहे. नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा थोडक्यात जवळपास संपूर्ण छत्रपती शिवाजी रस्ता वाहतूकीने इतका गच्च होते की पायी चालणेही मुश्किल होते. हे सगळे दिसत असूनही जुजबी उपाययोजना करण्यापलिकडे गेल्या काही वर्षात प्रशासनाकडून काहीही झालेले नाही. त्यांना त्याचे काहीही वाटत नाही.
पायी चालणेही झाले मुश्किल! पुण्यातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?#Pune#shivajiroad#trafficpic.twitter.com/jZYSDYhgOX
— Lokmat (@lokmat) June 14, 2025
पुणेकरांचे हाल लक्षात घेऊन वाहतूक शाखेने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने लाल महाल चौक, बुधवार चौक, दत्त मंदिर चौक या ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे. सदर रस्त्यावर फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशन असुन देखील वाहतुकीची ही परिस्थिती आहे. प्रत्यक्षात वाहतूक कोंडीच्या काळात या चौकांमध्ये साधे पोलिसही नसतात, त्यामुळे ज्याला जसे वाटेल तसे वाहन पुढे काढले जाते व कोंडी निर्माण होते असे नलावडे म्हणाले. या विषयावर अन्य राजकीय पक्ष, स्थानिक संस्था, संघटना यांनीही आवाज उठवावा असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.