राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 21:23 IST2025-05-27T21:22:57+5:302025-05-27T21:23:52+5:30
एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही

राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सासरा, सासू, दीर, नणंद, पती सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र हगवणे यांना मदत करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालानंतर आरोपींना कडक शिक्षेची मागणी होऊ लागली आहे. अशातच चित्रा वाघ यांनी वैष्णवीला मारलंय त्यांनी तिची हत्या केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना फाशी व्हावी हीच सगळ्यांची इच्छा असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. वाघ यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, अतिशय अमानवीय आणि राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय त्यांनी तिची हत्या केली आहे. आणि त्यामुळे त्यांना फाशी व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते. कोणीही असो कितीही मोठा असो कुणाच्या ताटात असो पण त्याला सोडलं जाणार नाही. आज या प्रकरणामध्ये वैष्णवीला मारणारे तिचा सासू, सासरा, दीर नणंद हे सगळेच्या सगळे आतमध्ये आहेत. त्यांना या दिवसांमध्ये फरार झाले होते. ज्यांनी ज्यांनी त्यांना आसरा द्यायचं काम केलं त्यांना सुद्धा आतमध्ये घेतलेलं आहे. एक माणूस फरार आहे तो सुद्धा लवकर पकडला जाईल.
पोलिसांना यामध्ये जितके काही धागेदोरे पोलिसांना सापडत आहेत. त्याच्यावरती कार्यवाही होईल कुणालाही सोडलं जाणार नाही. मला तर अगदी असं म्हणायचं आहे की, अशी शिक्षा, फाशी झाली पाहिजे की, कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे. घरच्या लेकी- सुनांवरती बोट लावायचं आणि त्यांना मारायचं. ज्या पद्धतीने तिला मारलं गेलंय. अमानुषपणे मारलं गेलंय आज त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये.
शवविच्छेदन अहवालाबाबत वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी तेच म्हटलं की, इतकी अमानुषपणे मारलं इतकं राक्षसीपणे मारलंय की विश्वास बसत नाहीये. या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही. असं तिच्या नऊ महिन्याचं लेकरू त्याच्यातही या हरामखोरांचा जीव अडकला नाही.
आयजी सुपेकरांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, देवेंद्रजींच्या राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्या आयजी सुपेकरांची कुठेही कशाही पद्धतीत थेट काही आढळून आले. किंवा मदत करण्याची भूमिका दिसली तर तात्काळ देवेंद्रजी कारवाई करतील हा मला विश्वास आहे. तसेच मयुरी जगतापच्या वेळी त्यावेळेला पोलीस कोण होते? दखल का घेतली गेली नाही? कोणी दबाव टाकला होता? कोणाच्या दबावामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. या सगळ्या गोष्टींची छानबीन होईल आणि अगदी काही दिवसातच सगळं जे सत्य आहे ते आपल्या समोर येईल.