या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:32 IST2025-05-29T16:27:39+5:302025-05-29T16:32:46+5:30
आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे.

या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला संताप
पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूंनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाइल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली, तर आरोपींच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर अनेक स्तरातून संताप व्यक्त केला जात असून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मनोज आखरे आज माध्यमांशी बोलतांना म्हणाले, काल कोर्टात अजब युक्तिवाद केला गेला. त्या बद्दलचा राग सर्वांनामध्ये आहे. मयत पीडितेबाबत ज्या प्रकारे काल वकिलांनी आरोप केले त्यांचा आम्ही निषेध करतो. आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे. तुम्ही वकील आहात तुम्हाला न्यायाधीशासमोर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मात्र वकिलांना सोशल मीडियावर मयत पीडितेच चारित्र्यहनन करण्याचा अधिकार कोणी दिला. असेही ते म्हणाले. या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे अशी मागणी आम्ही बार कॉन्सिलकडे मागणी करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामागे अनेक बाबी आहे. महिला आयोगाचा आणि पोलीस यंत्रणेचा ढिसाळ कारभार या प्रकरणानंतर पुढे आला आहे. महिला आयोग सुद्धा काय काम करते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेड लढत राहील. असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (२७), सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (२७) यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २८) संपली. त्यामुळे पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नीलेश चव्हाणचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे, तर लता, करिष्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाइलचादेखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजेस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली आहे. त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसाची, तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.