पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:19 IST2025-06-18T11:17:05+5:302025-06-18T11:19:10+5:30
अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय

पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय?
पुणे : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्याचा पॅटर्न आता पुण्यातही राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटनस्थळांवर शुल्क आकारले जाणार आहे. पर्यटनस्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची महिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. येत्या १५ दिवसांत शुल्काबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळांवर वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. जीवघेण्या दुर्घटना आणि अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचे नवीन पर्यटन धोरण निश्चित केले असून, यापूर्वी झालेल्या घटना, पर्यटनस्थळांवर असणाऱ्या त्रुटींचा अभ्यास करून हे धोरण ठरविले जाणार आहे.
याबाबत डुडी म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर शुल्क आकारले जाणार आहे. पुढील १५ दिवसांत पर्यटन धोरण ठरविले जाणार आहे. त्यात हे शुल्क किती असावे, पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्था कशा प्रकारे ठेवली जावी याची माहिती असेल. वनविभाग आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त समिती असणाऱ्या वन समितीमार्फत याची अंमलबजावणी केली जाईल. ही संयुक्त समिती पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या उपाययोजना करेल. तिथे बॅरिकेड्स लावले. पर्यटकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा तयार करेल. एकावेळी तिथे किती पर्यटक असेल असे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही समिती निर्णय घेईल. सातारा येथे जिल्हाधिकारी असताना पर्यटनस्थळांवर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. त्याचा फायदा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही डुडी यांनी सांगितले.