देशातील राजकारणाला शुद्ध करण्यासाठी सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात यावे - अनुराग सिंह ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:26 IST2026-02-24T09:26:02+5:302026-02-24T09:26:17+5:30
विरोधकांना राजकारण करावयाचे असेल तर त्यांनी तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे

देशातील राजकारणाला शुद्ध करण्यासाठी सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात यावे - अनुराग सिंह ठाकूर
पुणे : शिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांमध्ये आमूलाग्र बदल घडला आहे. आयआयटी, आयएमएम, कॉलेज, युनिव्हर्सिटी आदींच्या संख्येत वाढ झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी सेमीकंडक्टर, हेल्थकेअर आणि अन्य क्षेत्रांतील अतुलनीय वृद्धी होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणाला शुद्ध करण्यासाठी नवीन आणि सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात प्रवेश करावा, असे आवाहन लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे आयोजित पंधराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी, राज्यसभा खासदार डॉ. संदीप कुमार पाठक, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि सीईओ डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय छात्र संसदेसाठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचनही या वेळी करण्यात आले.
ठाकूर म्हणाले की, लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरण याबरोबरच केवळ एआय नैतिकतेची उपेक्षा करू शकत नाही. एकविसाव्या शतकात कॅम्पसमधून कॅबिनेटमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर एआय नैतिकतेशी जुळवून घेतले पाहिजे. तसेच विरोधकांना राजकारण करावयाचे असेल तर तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे.
डॉ. राहुल कराड म्हणाले, देशातील भ्रष्टाचार, जातीयवाद, धर्मांधता आणि वसाहतवादी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे.
विद्यार्थी दीपक कुमार पांडे, पूर्वी गंजीवाले, प्रताप पुंडे, उदय शर्मा, नेहाली चावडीकर यांनीही आपले विचार मांडले. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले; तर प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.