मित्रांसोबत खेळताना काळाचा घाला; येरवड्यात ११ वर्षीय मुलाचा पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 12:43 IST2026-02-08T12:33:56+5:302026-02-08T12:43:54+5:30
महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मित्रांसोबत खेळताना काळाचा घाला; येरवड्यात ११ वर्षीय मुलाचा पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
लोहगाव : येरवड्यातील जय जवाननगर परिसरात शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मित्रांसोबत डोंगरावर खेळायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा तोल जाऊन उंचावरून पडल्याने मृत्यू झाला. श्रेयस शेखर भोसले (रा.अशोकनगर, येरवडा) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस भोसले हा शनिवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत जय जवाननगर येथील डोंगराळ भागात खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो डोंगरावरून थेट खाली कोसळला. तो डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीनगर (येरवडा) पोलिस ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष जिवावर?
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिक शरद करनावट, एजाज खान, यासीन शेख, विलास माने आणि सुलेम शेख यांनी सांगितले की, या डोंगरावर सीमा भिंत (कंपाउंड वॅाल) बांधण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.
भीतीचे सावट आणि चार बळी -
या भागात डोंगर कडेला राहणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत येथे दरड कोसळण्याच्या आणि अशा प्रकारच्या एकूण चार दुर्दैवी घटना घडल्या असून, त्यात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. डोंगराचा भाग कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत, नागरिकांनी तातडीने सीमा भिंत बांधण्याची मागणी केली आहे.
‘श्रेयस हा खेळताना उंचावरून खाली डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.’ -रवींद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन