आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यासाठी यंदा बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याला मिळाला आहे. आळंदीतील विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे, सचिन बाळासाहेब घुंडरे यांना संयुक्तपणे हा मान असून विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन येथून ''राजा - प्रधान" ही बैलजोड सहा लाख रुपयांना तर ''सावकार - संग्राम'' ही बैलजोड हिंजवडी येथून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे.
अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून ५ लाख ५१ हजार रुपयांना ''मल्हार - आमदार'' तर दुसरा बैलजोड "माऊलीं - शंभू" उत्तम नगर येथून २ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केला आहे. दरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार आहे. या बैलांसाठी खुराक शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक खोबऱ्याचा भुगा, बैल खाद्य देत आहेत. दरम्यान सोमवारी (दि. २) या मानाच्या बैलजोडींची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माऊलींच्या महाद्वारात बैलांची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, ॲड. रोहणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, पंढरपूर मंदिर समितीच्या माधवी निगडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, अजित वडगावकर, ज्ञानेश्वर वीर, राहुल चिताळकर, विलासराव घुंडरे, रामचंद्र भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, अशोक कांबळे, सागर भोसले, योगीराज कुऱ्हाडे, सुनील रानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बैलजोडी मानकऱ्यांना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला.