"१२ तारखेला विलिनिकरणाच्या चर्चा होणार होत्या, यातच अचानक हा अपघात कसा झाला?" कराळे मास्तरांना वेगळाच संशय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:20 IST2026-02-11T20:19:35+5:302026-02-11T20:20:54+5:30
घातपात झाला असावा का? असे विचारले असता, मास्तर म्हणाले, "हो... मला तर वाटते, कारण..."

"१२ तारखेला विलिनिकरणाच्या चर्चा होणार होत्या, यातच अचानक हा अपघात कसा झाला?" कराळे मास्तरांना वेगळाच संशय!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अद्यापही विविध प्रकारचे प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात आता कराळे मास्तर नावाने प्रसिद्द असलेले नितेश कराळे यांनीही भाष्य केले आहे. "१२ तारखेला विलिनिकरणाच्या चर्चा होणार होत्या, यातच अचानक हा अपघात कसा झाला?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात रुबी हॉस्पिटल येथे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विचारले असता, कराळे मास्तर म्हणाले, "दादा साधारणपणे 'बाय रोड'च प्रवास करायचे. मात्र, इतक्यात त्यांना सल्ले देण्यात आले होते की, तुम्ही विमानाने वेळ वाचवण्यासाठी प्रवास करा. जी विमान कंपनी आहे, त्यातील अधिकारी पळून गेले, त्यांचे ऑफिसही तिथे नाही. दादांच्या शेड्युलमध्ये अचानक बदल करण्यात आला. पुण्याचे विमानतळ जवळ असताना, विझिबिलिटी नव्हती तर ते विमान तिकडे का नेले नाही? असे अनेक मुद्दे आहेत. रोहित दादांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, 'हा 'घातपात' असण्याची दाट शक्यता आहे.' यामुळे याची चौकशी अधिकारी मॅनेज व्हायच्या आधी करण्यात यावी.
"एक चांगला मुद्दा आहे की, तेथे जे काही पुरावे सापडले आहेत, ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे आणि पायलट लोकांची शेवटच्या क्षणी काय चर्चा झाली, हेही समजायला हवे. आदल्या दिवशी पायलट का बदलण्यात आले? याची सखोल चौकशी व्हायला हवी. या राजकारणात काही सांगता येत नाही. कारण सत्तेसाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. १२ तारखेला विलीनीकरणाची चर्चा होणार होती आणि यातच हा अपघात अचानक असा कसा झाला? सत्तेत कुणी वाटेकरू यायला हवेत की नकोत? याच्या मुळे हा घातपात झाला? हे काही सांगता येत नाही. यामुळे लवकरात लवकर चौकशी होऊन अहवाल बाहेर यायला हवा."
घातपात झाला असावा का? असे विचारले असता, मास्तर म्हणाले, "हो... मला तर वाटते, कारण काहीही सांगता येत नाही. भारतातल्या अनेक घटना, जसे पुलवामा हल्ला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (बिपिन रावत) यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना, यानंतर, अजित दादांची घटना आहे, यापूर्वीच्याही अनेक घटना आहेत, ज्यांची सखोल चौकशीच झाली नाही. या प्रकरणाची तरी सखोचौकशी व्हायला हवी. तसेच, मवा वाटते की, हा अपघात नसून घातपाताची घटना असू शकते."