'जबरदस्ती नाही, मी माझ्या इच्छेने निघून गेले', भिगवण अपहरण प्रकरणातील 'त्या' तरुणीचा व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:05 IST2026-02-18T17:05:21+5:302026-02-18T17:05:57+5:30
भिगवणमध्ये अपहरण झालेल्या तरुणीने आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे

'जबरदस्ती नाही, मी माझ्या इच्छेने निघून गेले', भिगवण अपहरण प्रकरणातील 'त्या' तरुणीचा व्हिडिओ समोर
भिगवण ( जि. पुणे): भिगवण परिसरात मंगळवारी (दि. १७) दुपारी सुमारे चारच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला आता धक्कादायक वळण समोर आले आहे. त्या तरुणी आणि तरुणाचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याने तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मी जाहीर शेख यांच्यासोबत ९ वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. कालच्या प्रकरणात माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाहीये. मी माझ्या इच्छेने आली असल्याचे तरुणीने व्हिडिओमधून सांगितले आहे.
या प्रकरणी दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे जाहीर हारून शेख व आयान हारून शेख (रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
ते पुढे म्हणाले, अपहरण झालेल्या तरुणीचे अवघ्या पाच दिवसांवर लग्न ठरले होते. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडिता व आरोपी यांच्यात पूर्वी टेस्ट कॉल व मेसेजद्वारे संपर्क झाल्याचे दिसून आले आहे. सध्या दोघांचे मोबाईल फोन बंद असून ते एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचा वाढीव बंदोबस्त
पोलीस यांच्या वतीने परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी नागरिकांना आवाहन केले की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही बेकायदेशीर किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत. “पोलीस योग्य तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. सर्वांनी शांतता राखावी,” असे त्यांनी सांगितले.