पालखी येण्याच्या मार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, चारवेळा भूमिपूजनाचे नारळ फुटले, काम सुरू झालेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:06 IST2025-06-20T16:04:45+5:302025-06-20T16:06:16+5:30

- किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

The road on the way to the palanquin was in poor condition, the coconuts for the foundation stone ceremony were broken four times, the work has not even started. | पालखी येण्याच्या मार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, चारवेळा भूमिपूजनाचे नारळ फुटले, काम सुरू झालेच नाही

पालखी येण्याच्या मार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, चारवेळा भूमिपूजनाचे नारळ फुटले, काम सुरू झालेच नाही

इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ज्या रस्त्याने इंदापुरात येते व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जाते, त्या इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत असणाऱ्या शेंडे मळा भागातील रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे कमालीची दुरवस्था झाली आहे.

आत्तापर्यंत किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत श्रीराम वेशीसमोर काही फूट अंतरावर शेंडेमळा आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळापासून बारामती राज्यरस्त्यापासून शेंडेमळ्यात जाणारा रस्ता वहिवाटीमध्ये आहे. या भागात बऱ्याच अपार्टमेंट झाल्या. एकूण ४०० लोक त्या भागात राहतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या वेळी दहा ते पंधरा दिंड्या शेंडेमळ्यात उतरतात. सुमारे ५० गाड्यांतील दोन हजार लोक तेथे मुक्कामास असतात.

शेंडेमळ्यातील हा रहदारीचा रस्ता अद्यापपर्यंत कच्चाच राहिला आहे. कोणतीही निवडणूक आली की, या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ फुटतो. त्या निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या नारळाचे कवचच काय, तो फोडणारे नेतेगणदेखील त्यानंतर नजरेला पडत नाहीत. आत्तापर्यंत चार वेळा असा प्रकार घडलेला आहे. त्याला कंटाळून अपरिहार्यता झाल्याने स्थानिक लोकांनी आजपर्यंत स्वखर्चाने त्या रस्त्याची सुधारणा केली आहे.

दोन-अडीच महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या नावाखाली नगरपरिषदेने तो रस्ता खोदला. काम झाल्यानंतर लावलिजाव करत बुजवला. मे महिन्याच्या शेवटी पडलेल्या मुसळधार पावसाने तकलादू स्वरूपात बुजवण्यात आलेल्या रस्त्याची पार शकले करून टाकली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक पावसात दुरवस्थेत भरच पडत चाललेली आहे. शेंडेमळ्याच्या वरच्या भागात भर टाकून व्यवस्थित रस्ता बनवण्यात आला आहे. शेंडेमळ्यातील रस्त्याच्या नशिबी मात्र वनवासच लिहिला गेला आहे. रस्त्याची ही कथा आहे. त्याखेरीज या भागात सांडपाणी वाहून नेण्याची सोयही करण्यात आलेली नाही. एका अपार्टमेंटच्या बाजूला हे सारे सांडपाणी साठून राहिलेले आहे. त्यामध्ये डुकरे स्वच्छंदपणे डुंबताना नजरेस पडणे नेहमीचे झाले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पाचवीला पुजलेली आहे.

येत्या १५ दिवसांमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्या पालखीतील वारकऱ्यांना या ओंगळवाण्या रस्त्याचे दर्शन घेऊन रिंगण सोहळ्यासाठी जावे लागणार आहे. इंदापुरातून पंढरपूरकडे प्रस्थान करताना, डॉ. आंबेडकरनगर भागातून अकलूज रस्त्याकडे जावे लागते. त्या रस्त्याच्या दुतर्फा अस्वच्छता व दुर्गंधी असल्यामुळे पालखीच्या विश्वस्तांनी या रस्त्याने जाणार नाही, त्यासाठी मुक्कामाला इंदापुरात येणार नाही, असा पवित्रा मध्यंतरीच्या काळात घेतला होता. नगरपरिषदेला ‘त्या’ रस्त्याच्या दुतर्फा आच्छादन करून व सुगंधी द्रव्ये फवारून पालखी प्रस्थानाची सोय करावी लागली होती; पण शेंडेमळा व त्याचा रस्ता पालखी येण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर पालखी आगमनापूर्वी तरी नगरपरिषद या रस्त्याची किमान डागडुजी करून सांडपाणी व्यवस्थापनाची सोय करेल का, असा प्रश्न स्थानिकांच्या मनाला भेडसावतो आहे.

Web Title: The road on the way to the palanquin was in poor condition, the coconuts for the foundation stone ceremony were broken four times, the work has not even started.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.