राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच; अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी
By नितीन चौधरी | Updated: December 26, 2023 10:50 IST2023-12-26T10:48:59+5:302023-12-26T10:50:08+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड

राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच; अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी
पुणे : राज्यात नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदत केव्हा मिळेल, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पंचनाम्यांचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले आहे.
राज्यात २४ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे कोकण वगळता बहुतांश जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार ७ लाख ८८ हजार १०१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन विभागाने कृषी विभागाला दिले. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम आकडा निश्चित झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक नुकसान बुलढाण्यात
कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १ लाख २८ हजार २०१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर अमरावती जिल्ह्यातही १ लाख १५ हजार ४९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर
दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून, त्यापैकी ३०० कोटींपेक्षा जास्तीचे वाटपदेखील झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार एकूण बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ठाणे ९१, पालघर १५८९, रत्नागिरी ८८, सिंधुदुर्ग १, नाशिक ३३३८८, धुळे २९४, नंदुरबार २८८७, जळगाव ९०५, नगर १५३०७, पुणे ७८६४, सोलापूर २९७७६, सातारा १५, सांगली १६५५९, छत्रपती संभाजीनगर ४५७८३, जालना ७६८०३, बीड २१५, धाराशिव २०६८, हिंगोली ७९४०२, परभणी १०००, नांदेड ३००३, लातूर २४६, बुलढाणा १२८२०१, अकोला ६३८६१, वाशिम ९९६१, यवतमाळ १२६४३८, अमरावती ११५०४९, गडचिरोली ३०, वर्धा ५८३, नागपूर १९७६, भंडारा ८६०८, गोंदिया २७७५, चंद्रपूर १३३३५ एकूण ७८८१०१.