११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:28 IST2025-06-28T11:27:32+5:302025-06-28T11:28:23+5:30
आता ३० जूनला यादी प्रसिद्ध होणार; मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहा दिवस आधी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण हाेणार, म्हणून पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत हाेते. पण, अकरावी प्रवेश प्रक्रियेत वारंवार हाेणाऱ्या विलंबामुळे आनंदावर विरजण पडले आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा तांत्रिक अडचणीत अडकली असून, पहिली निवड यादी जाहीर होण्यास पुन्हा चार दिवस विलंब होत आहे. ही यादी सोमवारी (दि. ३०) जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. याबद्दल विद्यार्थी - पालक यांच्यासह अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करायचा या चिंतेमुळे कॉलेजांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.
नव्या वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? विद्यार्थांना पडला प्रश्न
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ दिसत नसल्याने प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे.
परिणामी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही नव्याने प्रसिद्ध करावे लागले आहे. पण, मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार? असा प्रश्न पडला आहे.
प्रवेशासाठीही ‘तारीख पे तारीख?’
अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होत आहे.
त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ३० जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ३० जून ही तारीख तरी पाळली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.