ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
By अजित मांडके | Updated: December 27, 2025 20:56 IST2025-12-27T20:47:16+5:302025-12-27T20:56:43+5:30
Thane Municipal Corporation Election: ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शनिवारी तीन तास झालेल्या बैठकीत देखील अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
ठाणे : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शनिवारी तीन तास झालेल्या बैठकीत देखील अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
या प्रलंबित जागांबाबत लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, त्यातून अंतिम तोडगा निघेल, असा विश्वास शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. रविवार पर्यन्त जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शनिवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात महायुतीची जागावाटपाबाबत तिसरी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हस्के यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकाही महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महायुतीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येऊन उमेदवारांपर्यंत युतीचा संदेश पोहोचवण्यात येणार आहे.
दरम्यान, महायुतीची पहिली बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत युती न करण्याची भूमिका जाहीर केली होती. यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के यांनी सांगितले की, “आनंद परांजपे यांना ही बाब माहिती नसल्यामुळेच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीच्या बैठकीस आमंत्रण देण्यात आले नसावे.”
याच वेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. “ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी नाशिक आणि पुण्यात फिरावे लागत आहे, त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा आणि नंतर महायुतीवर टीका करावी,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
तीन प्रभागांमध्ये काहीसा ताळमेळ बसत नाहीये मात्र पुढील 24 तासात त्याचा मार्ग देखील काढला जाणार आहे आणि युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जातील. याबाबत दोन्ही बाजूने निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे हा विषय सोपविण्यात आला आहे. काही तासातच याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य असा निर्णय घेऊन युती जाहीर होईल.
- निरंजन डावखरे : निवडणूक प्रभारी - ठाणे, भाजप
गुरुवारी ठाणे महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देणाऱ्या मीनाक्षी शिंदे ही शनिवारी झालेल्या युतीच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी मीनाक्षी शिंदे यांना त्यांच्या राजीनामा बाबत विचारले असता. आधी युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल मग माझ्या राजीनामाच्या बाबतीतही निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
अल्टिमेटम देणारे आमदार संजय केळकर अनुपस्थित
भाजपचा फॉर्मुला पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्षांकडे युतीसंदर्भातील सर्व तपशील देण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाल्यानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी युतीबाबत निर्णयासाठी शिंदेसेनेला शनिवारची अंतिम डेडलाईन दिली होती. मात्र शनिवारी महायुतीच्या झालेल्या तिसऱ्या बैठकीला केळकर अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते.