...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:08 IST2026-03-13T17:06:40+5:302026-03-13T17:08:46+5:30
मला गुरुसमान असणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकरांना भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. दुपारी जेवण्याची वेळ असल्यामुळे अण्णासाहेब म्हणाले की, महेश जेवण करून ये. तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे

...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण
पुणे: आज यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझा फार मोठा सन्मान आहे. या पुरस्काराची संकल्पना पुण्यातील गंगालॉज मध्ये उगम पावली आणि १९७५ मध्ये गंगा लाॅजच्या खालच्या मजल्यापासूनच माझी कारकीर्द सुरू झाली. हा एक विलक्षण योगायोग आहे. मला गुरुसमान असणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकरांचे कार्यालय गंगा लाॅजच्या खालीच होते. माझा तो संघर्षाच्या काळ होता. मी त्यांना भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. दुपारी जेवण्याची वेळ असल्यामुळे अण्णासाहेब म्हणाले की महेश जेवण करून ये. तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे...अशी मिश्किल आठवण ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने महेश कोठारे यांना 'यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार', तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना 'अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार' प्रदान करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते . या दोन पुरस्कारांसह 'यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार' बुलढाणा येथील प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह-विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर (दंडकारूण्य) व नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार (कवितासंग्रह - वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख ११,००१ व सन्मानचिन्ह असे होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, संयोजक व प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ट्रस्टचे गौरव फुटाणे, मित्र मंडळाचे सचिन जाधव, कुणाल जाधव, नगरसेवक व माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.
अजितदादा पवार हे कामाचा माणूस होते. त्यामुळे एका कामाच्या माणसाला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद अधिक आहे, अशी भावना प्रसाद गावडे यांनी व्यक्त केली. तरुणांसाठी कोकण जिवंत राहायला हवे. कारण ही जीवन शाळा आहे. आपण विकास नको म्हणतो विकास प्रकल्पाला विरोध करतो पण लाखमोलाचे जगणे लोक संस्कृती मधून तयार झाले आहे. काम करणारी माणसे नक्षलवादी ठरवली जातात. विकास व चंगळवादासाठी कोकणातल्या जमिनी विकू नयेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सतीश आळेकर म्हणाले, "ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मराठी नाटकांवर करमणूक कर आकारला जाणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या दूरदर्शी निर्णयाचे फायदे आजतागायत मराठी नाट्यसृष्टीला मिळत आहेत. कलासक्त यशवंतरावांचे हे द्रष्टेपण लक्षणीय होते. अंजली कुलकर्णी यांनी साहित्य पुरस्कारप्राप्त कवींचा परिचय करून दिला. राजेश्वरी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय ढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.पुरस्कार वितरणानंतर कवी संमेलन रंगले.