MPSC च्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून तरुणाची नदीपात्रात उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 17:22 IST2019-06-19T17:18:55+5:302019-06-19T17:22:11+5:30
स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रांसह बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.

MPSC च्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून तरुणाची नदीपात्रात उडी मारून आत्महत्या
राजगुरूनगर : एमपीएससी परीक्षेत नापास झाल्यामुळे राजगुरुनगर येथील केदारेश्वर बंधाऱ्यात २८ वर्षीय तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना (दि. १९ ) घडली आहे. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर (ता खेड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश याने कंपनीतील नोकरी सोडून दिली होती. कंपनीतील नोकरी सोडून दिल्यापासून रुपेश पुन्हा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे येथे राहण्यास होता. सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी रुपेश यांनी दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत रुपेश नापास झाला होता. तेव्हापासून तो नाराज होता. सध्या तो अभ्यासासाठी रांजणगाव (ता. शिरुर ) सुरू येथे राहत होता. मानसिकरित्या खचुन गेल्यामुळे रुपेश याने स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रे यांच्यासह भीमानदीवरती असणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी १० वाजता नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात तरंगत असलेल्या बाहेर काढल्यावर खिशात पासपोर्टवरील नावामुळे रुपेश ची ओळख पटली. नगर परिषदेच्या नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय यांनी रुपेशच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.याबाबत रुपेशचे वडील विष्णू शिवराम बोऱ्हाडे (रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर )यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..