भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले; सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना
By नम्रता फडणीस | Updated: April 1, 2025 18:16 IST2025-04-01T18:15:30+5:302025-04-01T18:16:05+5:30
वारजे परिसरातील स्वीट काॅर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले, दुचाकी घसरल्याने सहप्रवासी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती

भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले; सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना
पुणे : भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात घडली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक), असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. याबाबत जय याचे वडील भगवान सुखदेव अवघड (४८, रा. वाकळुनी, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय अवघड मूळचा जालना जिल्ह्यातील वाकळुनी गावचा आहे. रविवारी (दि. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार शुभम आणि त्याचा मित्र जय हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. वारजे परिसरातील स्वीट काॅर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वार शुभम याचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सहप्रवासी जय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीस्वार शुभम हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जय याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.