पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरून आता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी थेट जाता येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)कडून दोन्ही स्थानकांना जोडणाऱ्या १३८ मीटर लांबीच्या पादचारी पुलाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत हिंजवडी मेट्रो सेवा शिवाजीनगरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या पुलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून उभारण्यात येत आहे. या मार्गाचे शेवटचे स्थानक जिल्हा न्यायालय परिसरात आहे. येथून महामेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकात सहज प्रवेश मिळावा, यासाठी चार मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी एकूण सहा कॉलम उभारण्यात येणार असून, त्यापैकी तीन कॉलमचे काम पूर्णत्वाकडे आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असून, पुढील तीन महिन्यांत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पुलामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी ‘पुणेरी मेट्रो’ (लाईन ३) थेट जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे. दोन्ही स्थानकांच्या कॉन्कोर्स स्तरावरून प्रवाशांना थेट हालचाल करता येणार आहे.
जलद व सुरक्षित होणार प्रवास
हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे. एप्रिलपर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले, तरी शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे काही काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा ठरणार असून, दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद व सुरक्षित बदल करता येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा दुवा महत्त्वाचा मानला जात आहे.
Web Summary : A 138-meter pedestrian bridge connecting Hinjewadi-Shivajinagar metro lines is under construction. This will provide seamless transfer at District Court station, promising faster and safer travel. The bridge aims to reduce traffic congestion.
Web Summary : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइनों को जोड़ने वाला 138 मीटर का पैदल पुल निर्माणाधीन है। इससे जिला न्यायालय स्टेशन पर सुगम स्थानांतरण होगा, जिससे तेज और सुरक्षित यात्रा का वादा किया गया है। पुल का उद्देश्य यातायात की भीड़ को कम करना है।