Shree kshetra Paramdham Math : श्री क्षेत्र परमधाम मठ: अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा संगम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:39 IST2024-12-26T18:34:29+5:302024-12-26T18:39:09+5:30
हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे, ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते.

Shree kshetra Paramdham Math : श्री क्षेत्र परमधाम मठ: अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा संगम
पुणे :महाराष्ट्रभूमी, संतपरंपरेने पावन झालेली भूमी, आजही विविध अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत आहे. याच परंपरेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला श्री क्षेत्र परमधाम मठ (तपोवन परिसर) हा अध्यात्म, समाजकार्य आणि निसर्ग संवर्धनासाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज आणि प.पू. श्री महावतार बाबाजींच्या प्रेरणेने स्थापन
२०१० साली पुणे-नाशिक महामार्गाजवळील आरुडेवाडी येथे श्री क्षेत्र परमधाम मठ स्थापन करण्यात आला. या मठाची स्थापना प.पू. श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) आणि प.पू. श्री महावतार बाबाजी यांच्या प्रेरणेने झाली. हिमालय निवासी महावतार बाबाजी यांचे वय आज अंदाजे १८०० वर्षे आहे आणि ते आजही मानवी देह धारण करून जिवंत असल्याचे मानले जाते. अध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून या संतांच्या अवतार कार्याची ओळख सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मठाचा मुख्य उद्देश आहे.
अध्यात्मासोबत सामाजिक कार्य
श्री क्षेत्र परमधाम मठामध्ये केवळ अध्यात्मिक कार्याचाच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांचाही अवलंब केला जातो. या उपक्रमांमध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश आहे.
• ध्यानमंदिर आणि गोशाळा स्थापन
• नक्षत्र वाटिका निर्माण
• आदिवासी जनांचे उत्थान आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
• स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण
• वृद्धाश्रम आणि मोफत वैद्यकीय सुविधा
• दुर्मिळ औषधी वृक्षांची लागवड आणि संवर्धन
• जंगलातील जीवजंतू आणि गोमातेचे संरक्षण
याशिवाय समाजातील अंधश्रद्धा नष्ट करणे, तळागाळातील जनतेपर्यंत पारमार्थिक जाणीवा पोहोचवणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानधारणेला प्रोत्साहन देणे, यावरही मठाने भर दिला आहे.
दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहन
मठाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी परमधाम महावतार बाबाजी सेवा फाउंडेशन समाजातील दानशूर व्यक्तींना योगदानासाठी आवाहन करीत आहे. आपल्या प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांनी एक वृक्ष लावावे आणि धरती मातेला सुंदर भेट देऊन निसर्ग संवर्धनासाठी योगदान द्यावे, असेही फाउंडेशनचे आवाहन आहे.
धार्मिक अधिष्ठानातून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा संकल्प
श्री क्षेत्र परमधाम मठाचा मुख्य उद्देश अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवून आणणे आहे. यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि नैसर्गिक आरोग्याचे संवर्धन होईल. आपल्या संतपरंपरेने पावन झालेल्या महाराष्ट्रात असा अनोखा अध्यात्मिक मठ स्थापन झाल्याने, तो समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.