श्री ज्वेलर्स भिसी प्रकरण, ३६ जणांची ४२ लाख, २१ तोळ्यांहून अधिक सोन्याची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:35 IST2025-06-10T10:34:19+5:302025-06-10T10:35:54+5:30
दहिवाळ दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल

श्री ज्वेलर्स भिसी प्रकरण, ३६ जणांची ४२ लाख, २१ तोळ्यांहून अधिक सोन्याची फसवणूक
पुणे : भिसीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धायरी परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकान मालकासह त्याच्या पत्नी विरोधात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांनी ३६ जणांकडून रोकड आणि सोने घेऊन तब्बल ४२ लाख ७८ हजार २०० रुपये तर, २१ तोळे वजनाचे सोने घेतले आहे. याप्रकरणी यशवंत अंबादास हबीब (३५, व्यवसाय आचारी, रा. नऱ्हे) यांनी नांदेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विष्णू सखाराम दहिवाळ व त्याची पत्नी स्वाती विष्णू दहिवाळ, अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना मे २०२४ ते २५ मे २०२५ दरम्यानच्या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत हबीब व त्यांच्या पत्नीने श्री ज्वेलर्समध्ये भिसीच्या माध्यमातून १ लाख ३० हजार रुपये गुंतवले होते. त्याशिवाय याआधी घेतलेले १८ ग्रॅम वजनाचे गंठण मोडून त्याचे १ लाख ९ हजार रुपये व आणखी १ लाख रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात भरून, ४ तोळे वजनाचे गंठण घेण्यासाठी एकूण ३ लाख ३९ हजार रुपये दहिवाळ दांपत्याकडे जमा केले. मात्र, २५ मे रोजी दुकान बंद आढळले आणि त्यानंतर दहिवाळ दांपत्य फरार झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले.
याशिवाय इतर ३५ नागरिकांनी देखील दरमहा भिसी स्वरूपात रोख रकमा व काहींनी थेट सोने आरोपींकडे गुंतवले होते. दहिवाळ दाम्पत्याने एकूण ४२ लाख ७८ हजार रुपये आणि २१ तोळे वजनाचे सोने अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, परिसरात त्यांनी दुकानात चोरी झाल्याचा बनावही केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार दहिवाळ दाम्पत्याचा शोध सुरू केला आहे.