Chandrakant Patil: 'नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था शिंदे-फडणवीस सरकारकडे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 14:12 IST2022-10-15T14:11:29+5:302022-10-15T14:12:04+5:30
महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली

Chandrakant Patil: 'नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था शिंदे-फडणवीस सरकारकडे'
मुंबई - महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असे भाकीत भाजप नेते करत होते. आता, शिंदे-फडणवीस सरकारही कोसळेल, असे भाकीत महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे विधान केले होते. आता, जयंत पाटील यांच्या विधानावर भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, सरकारमध्ये कोणीही नाराज नसल्याचे सांगत, नाराजांची व्यवस्था करण्यात येते, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र, कपटाने सरकार पाडण्यात आले, त्यामुळे हे सरकारही लवकच कोसळेल अशी टीका आणि भाकीत जयंत पाटील यांनी केले होते. त्यावर, पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केले की, हे सरकार अडीच वर्ष राहणार नाही. परंतु, असे काहीच झालेले नाही, सरकारमध्ये कोणीही नाराज नाही. जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजुत काढण्याची व्यवस्था शिवसेना-भाजप सरकारकडे आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री म्हणून सगळ्याच विषयांचा मी आढावा घेणार आहे. एकुण ९ बैठकांचे नियोजन केले आहे. पुण्यात सेक्सटोर्शनमुळे मुलांचे बळी जात आहेत, यावर काय उपाययोजना केली जाईल या विषयी हेड क्वॅाटर्स आणि सायबर डिपार्टमेंट सोबतरही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते जयंत पाटील
"ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले. त्यांचा कारभार फक्त एका वर्षाचा आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने वेदांताचा प्रकल्प खेचून महाराष्ट्रात आणला होता तो प्रकल्प आज या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला गेला. इतरही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून इतर राज्यात जात आहेत," अशी टीका जयंत पाटील यांनी केली.