Sharad Pawar: नेतृत्वाच्या सूचनेशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील; शरद पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:55 IST2025-06-20T10:54:06+5:302025-06-20T10:55:26+5:30
रात्री बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचा समजून घ्यावा

Sharad Pawar: नेतृत्वाच्या सूचनेशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील; शरद पवारांचा सवाल
पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून,आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे.बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत सुरु होती.या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि पैशांच्या वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याने खळबळ माजलेली दिसत होती. यावरून आता शरद पवारांनी सवाल उपस्थित करत सरकाराव टीका केली आहे. बँक कशी उघडी राहते? असं म्हणत नेतृत्वाच्या सूचनेशिवाय असं होणार नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी देखील जिल्हा बँक उघडलेली होती. तेव्हा रात्री बारापर्यंत बँक उघडी होती. आताही तसंच घडलं आहे, बँक कशी उघडी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्याकडे नेतृत्व आहे. त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील. रात्री बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचा समजून घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे यांनी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. सुनील मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले. अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं..? असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचं काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत आम्ही काही अजून काही ठरवलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाही. आम्ही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत. पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे पवारांनी सांगितले आहे.