कोरोनानंतर बंद झालेली बारामती-कर्जत पॅसेंजर पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:19 IST2026-02-10T12:13:06+5:302026-02-10T12:19:05+5:30
सध्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वरील वाढती वाहतूककोंडी, अपघातांचे प्रमाण आणि प्रवाशांचा वाढता प्रवास वेळ लक्षात घेता, ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे हा अत्यंत उपयुक्त ठरणार

कोरोनानंतर बंद झालेली बारामती-कर्जत पॅसेंजर पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणी
पुणे : बारामती ते कर्जत दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पुन्हा एकदा प्रवासी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वरील वाढती वाहतूककोंडी, अपघातांचे प्रमाण आणि प्रवाशांचा वाढता प्रवास वेळ लक्षात घेता, ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी केली आहे.
कोरोनापूर्वी बारामतीहूनकर्जतसाठी पॅसेंजर गाडी दररोज सकाळी ७ वाजता निघायची, ही गाडी दौंडमार्गे पुण्यात पोहोचायची, सकाळी अकरा वाजता पुण्याहून कर्जतच्या दिशेने ही गाडी रवाना व्हायचीख पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, खोपोली मार्गे ही गाडी दुपारपर्यंत कर्जत स्थानकात पोहोचत होती. कर्जत येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांसाठी मुंबई उपनगरातील लोकल रेल्वे सेवा सहज उपलब्ध होत होती. कर्जतहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच पुढे घाटकोपर, कुर्ला आणि दादर येथे सहज पोहोचता येत होते. त्यामुळे बारामती व परिसरातील प्रवाशांसाठी मुंबई-ठाणे आणि उपनगरात जाण्यासाठी ही पॅसेंजर गाडी अत्यंत महत्त्वाची ठरत होती. या सेवेचा मोठ्या प्रमाणावर फायदा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक आणि कामगार वर्गाला होत होता.
ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना दिलासा
सकाळी घरातून निघून दुपारपर्यंत कर्जत गाठून संध्याकाळपर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर किंवा अंबरनाथ येथे पोहोचणे शक्य होत होते. या पार्श्वभूमीवर बारामती-कर्जत पॅसेंजर पुन्हा सुरू झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत : बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईत रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा पुन्हा एकदा वरदान ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
बारामती ते कर्जत पॅसेंजर सेवा कोरोनानंतर बंद करण्यात आली असून, अद्याप ती सुरू झालेली नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहने, बस किंवा एक्स्प्रेस वे मार्गे प्रवास करावा लागत आहे. यामुळे पुणे-मुंबई महामार्ग आणि एक्स्प्रेस वे वरील वाहतूककोंडी अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे ही गाडी सुरू केल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे. - सागर माळी, रेल्वे प्रवासी