स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:42 IST2025-05-29T09:41:38+5:302025-05-29T09:42:44+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

Remove the obstruction of the welcome pavilions, orders Chief Minister Devendra Fadnavis | स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे : पालखी मार्गावर शहरी तसेच ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या स्वागत मंडपांमुळे वारकऱ्यांना चालवण्यात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार गांभीर्याने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मंडप पालखी मार्गात येणार नाहीत, अशी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत तसेच दिंडीकऱ्यांच्या वाहनांना रथाच्या प्रस्थानापूर्वीच मार्गस्थ करण्याच्या सूचना, फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंडप रस्त्यात उभे राहणार नाहीत, त्याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हडपसर ते दिवे घाट दरम्यान खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. गेल्या आठवड्यात वारीसंदर्भात झालेल्या बैठकीत पालखी मार्गात शहरी तसेच ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था अनेक राजकीय सामाजिक संस्था वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कमानी तसेच स्वागत मंडप उभे करतात. यामुळे वारकऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार देहू तसेच आळंदी सोहळा प्रमुखांनी केली होती. या तक्रारीची फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत हे मंडप पालखी मार्गात येणार नाहीत अशा स्वरूपाची व्यवस्था करावी, असे आदेश यांना दिले.

दिंडीकऱ्यांच्या वाहनांना वाहतूक विभागाकडून ठराविक वेळेतच पालखी मार्गावरून सोडले जाते. परिणामी वाहतूक कोंडी होते तसेच पालखीत चालणाऱ्या वारकऱ्यांना चालताना अडसर निर्माण होतो. त्यामुळे ही वाहने रथ मार्गस्थ होण्यापूर्वीच सोडण्यात यावीत, अशी मागणी देखील सोहळा प्रमुखांनी केली होती. त्या अनुषंगाने फडणवीस यांनी या वाहनांना लवकर सोडण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत असेही सांगितले. त्याचप्रमाणे आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची पुरेशी संख्या ठेवावी, असे निर्देशही दिले. त्याच बैठकीत आषाढी वारीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या दिंड्याबाबत संबंधित जिल्ह्यांमध्ये बैठका होत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या जिल्ह्यांनी संबंधित दिंड्यांच्या तक्रारीसंदर्भात बैठक आयोजित करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.

याबाबत डुडी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंडप रस्त्यात उभे राहणार नाहीत, यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. यंदा मान्सून लवकर दाखल झाला असल्याने पेरण्या लवकर उरकतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गेल्यावर्षी दहा लाख वारकरी आषाढी वारीत सामील झाले होते. ही संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारच जिल्हा प्रशासनाने २० लाख वारकऱ्यांच्या सोयीसाठीचे नियोजन केले आहे.”

एनएचएआयला खड्डे बुजविण्याच्या सूचना

जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी मार्गासंदर्भात मंगळवारी पाहणी केली. त्यात हडपसर ते दिवे घाट हा रस्ता या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. वारीपूर्वी हे काम संपणार नसल्याने तात्पुरता उपाय म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स डांबराचा वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वारीच्या काळात रस्त्यात असलेली यंत्रे तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्याचे संबंधितांना सांगितले आहे. पाऊस उघडल्यानंतर तीन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम करावे, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Remove the obstruction of the welcome pavilions, orders Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.