पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी (दि.१२) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, या सर्व जिल्ह्यांना ‘ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे, तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात गुरुवारी (दि.१२) व शुक्रवारी (दि.१३) मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस उत्तर कोकण ते उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हेवगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, सर्व जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आणि राज्यातील सर्वच भागात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यांनतर २८ मेपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, आता गुरुवारपासून (दि. १२) पावसाचे राज्यात पुन्हा आगमन होणार असून, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊस बरसणार आहे.
पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात घट
पावसामुळे मध्य महाराष्ट्रासह कोकण गोवा आणि विदर्भ व मराठवाड्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात काहीअंशी घट झाली आहे. मात्र, सांगली, कोल्हापूर, परभणीमधील तापमानाचा पारा तिशीच्या वर गेला असून, विदर्भातील अकोला व अमरावतीमधील कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. सर्वाधिक तापमान अमरावती येथे ३९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.