सर्वांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय : अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:19 IST2026-02-01T13:18:46+5:302026-02-01T13:19:53+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सर्वांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय : अमोल कोल्हे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी सहा–सात महिन्यांपूर्वीच मांडला होता. त्यानंतर दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून सर्वांना विश्वासात घेण्यात आले. अखेर १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
डॉ. कोल्हे म्हणाले, अजित पवार यांनी मांडलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावानंतर त्यांनी स्वतः आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही गटांतील नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जागावाटप करून निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही बहुतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढवत आहेत.
बारामती येथे १७ जानेवारीला झालेल्या बैठकीत माझ्यासह जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबतची संपूर्ण माहिती शरद पवार यांना दिली. दोन्ही गटांतील नेत्यांची संमती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यामुळे निवडणुका पूर्ण झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.