२० किमी प्रवासासाठी ५०० रुपये..! पुणे शहरातील कॅब, रिक्षा भाड्यापेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:35 IST2026-02-17T10:26:16+5:302026-02-17T10:35:07+5:30
पुण्यातून दिवसा ७५ रेल्वे गाड्या सुटतात तर बाहेरून दीडशे रेल्वे गाड्या ये-जा करतात.

२० किमी प्रवासासाठी ५०० रुपये..! पुणे शहरातील कॅब, रिक्षा भाड्यापेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त
- अंबादास गवंडी
पुणे : दिवसा आणि रात्री रेल्वे प्रवास करून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या लाखात आहे. रात्रीच्या वेळी इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनांसाठी शोधाशोध करावी लागते. याच संधीचा गैरफायदा कॅब, रिक्षाचालकांकडून घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत आहे. रेल्वेचा लांबचा प्रवास दीडशे ते दोनशे रुपयात, तर २० किलोमीटरच्या प्रवासाठी चारशे ते पाचशे रुपये मोजून करावा लागत आहे. याकडे सर्व यंत्रणांचे दुर्लक्ष होत असून, त्याचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे विभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसरात्र प्रवाशांची गर्दी असते.
पुण्यातून दिवसा ७५ रेल्वे गाड्या सुटतात तर बाहेरून दीडशे रेल्वे गाड्या ये-जा करतात. परिणामी दिवस-रात्र या ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते.पुण्यात आल्यावर इच्छितस्थळी जाण्यासाठी कॅब, रिक्षा शोधावी लागते. दरम्यान, नवीन प्रवासी पुण्यात आल्यावर मनाला वाटेल तसे भाडे आकारले जाते. दुसरीकडे पुण्यातील भार कमी करण्यासाठी हडपसर रेल्वे टर्मिनल येथे एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र टर्मिनलबाहेरील अपुऱ्या सुविधा, अरुंद रस्ते आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेकदा रेल्वे तिकिटापेक्षाही जास्त पैसे रिक्षा किंवा कॅबसाठी मोजावे लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. याठिकाणी पीएमपीची सेवा अत्यंत मर्यादित असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, टर्मिनलबाहेर रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रार वाढल्या आहेत. परंतु याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न विचारले जात आहे.
गाड्या वाढल्या, सुविधा मात्र अपुऱ्या :
पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून विकसित केलेल्या हडपसर टर्मिनलवरून दररोज किमान १२ हून अधिक एक्स्प्रेस गाड्या येथून धावतात. प्रत्येक गाडीतून साधारण दोन हजार प्रवासी या ठिकाणावरून ये-जा करतात. मात्र, टर्मिनलकडे जाणारे दोन मुख्य आणि एक छोटा रस्ता अत्यंत अरूंद आहेत. एका वेळी एकच वाहन जाऊ शकते, अशी स्थिती आहे. मोठ्या बस आत शिरल्यास इतर वाहतूक ठप्प होते. त्याचा फायदा रिक्षा, कॅबचालक घेत आहेत.
गाड्यांच्या गर्दीमुळे वाट शोधणे कठीण :
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशाच्या शोधात दिवस-रात्र कॅब, रिक्षा उभा असतात. त्यामुळे स्थानकाबाहेर गाड्यांच्या रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी वाट शोधावी लागते. त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासन, आरपीएफ, महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
अशी आहे आकडेवारी :
-पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या - ७५
-पुणे स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या गाड्या - १८०
-दैनंदिन प्रवासी संख्या - दीड लाख
पहाटे पुणे स्टेशनवर उतरल्यानंतर कर्वेनगरला जाण्यासाठी रिक्षाचालकाने साडेतीनशे रुपये घेतले. सुरुवातीला चारशे रुपये मागितले होते. प्रत्येक वेळी मनमानी भाडे आकारले जाते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. - अमर माळी, प्रवासी