Police Bharti 2026: पोलिस शिपाई लेखी परीक्षा जवळ, प्रवेशपत्र गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:18 IST2026-03-19T16:18:09+5:302026-03-19T16:18:28+5:30
Maharashtra Pune Police Bharti 2026: या पदांसाठी शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २२ मार्चला नियोजित लेखी परीक्षा होणार

Police Bharti 2026: पोलिस शिपाई लेखी परीक्षा जवळ, प्रवेशपत्र गायब
बारामती : महाराष्ट्रपोलिस दलात १५,००० पेक्षा जास्त पदांची पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पुणे शिपाई पदासाठी उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवारी (दि. २२) लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेचे प्रवेशपत्र न मिळाल्याने उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
पुणे शहरासाठी पोलिस शिपाई संवर्गात १७०० पदे, तसेच बॅण्डसमन करीता ३३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २२ मार्चला नियोजित लेखी परीक्षा होणार आहे. संपूर्ण राज्यातून उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात. या परीक्षेला येण्यासाठी पुण्यात नागपूर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून अंतर अधिक आहे. या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी पात्र उमेदवारांना वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते. मात्र, अद्याप लेखी परीक्षेसाठी आवश्यक प्रवेश पत्र मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऐनवेळी मोठी धावपळ होण्याची भीती आहे.
सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, नियमांनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो. यानुसार उमेदवारांनी खूप लांबच्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले आहेत. लेखी परीक्षेसाठी खूप लांब असणाऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी उमेदवाराला रेल्वेचे, बसचे आरक्षण करणे व इतर गोष्टीसाठी पुरेसा कालावधी मिळणे गरजेचे आहे. लेखी परीक्षेच्या तारखा जवळ येऊनसुद्धा अद्याप प्रवेशपत्र उपलब्ध झाले नाही. पोलीस प्रशासनाने याबाबत तत्परता दाखवून विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेशपत्र मिळण्याचे नियोजन करावे, त्यामुळे विद्यार्थ्यांची गोंधळलेली अवस्था दूर होण्यास मदत होईल, असे रुपनवर म्हणाले. ठाणे शहर पोलिस भरतीसाठी पात्र उमेदवारांची २९ मार्चला लेखी परीक्षा आहे. मात्र,पुणे पोलिस भरतीची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र मिळालेले नाही. याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.