पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:22 IST2025-05-31T09:21:30+5:302025-05-31T09:22:05+5:30
शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत

पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत
सासवड :पुरंदरविमानतळाला दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. ३०) बाधित गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची भूमिका आणि या ठिकाणी विमातळ उभारणीस नक्की काय अडचण आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पास आमचा तीव्र विरोध असून, प्रकल्प रद्द करावा व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, पुरंदर परिसरात प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा संपूर्णपणे अन्यायकारक, शेतकरीविरोधी व पर्यावरणविरोधी आहे. सध्या ड्रोन सर्वे चालू झाला होता, त्या धास्तीने वामन वसंत मेमाने व अंजनाबाई महादेव कामठे या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. पुढे देखील असे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा विमानतळ प्रकल्पास तीव्र विरोध आहे, यामध्ये आपण लक्ष घालून शेतकऱ्यांस न्याय द्यावा. प्रकल्पासाठी लागणारी जमीन ही सुपीक, सातत्याने लागवडीत असलेली आहे. या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. जमीन गेल्यास आमच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल. हा परिसर जैवविविधतेने समृद्ध असून, अनेक डोंगर, नद्या, व जलस्रोत आहेत. विमानतळामुळे जंगलतोड, भूगर्भजल कमी होणे व नैसर्गिक साखळी तुटण्याची शक्यता आहे. विमानतळसाठी पर्यायी जागांचा विचार न केल्याची खंत व्यक्त करत अशा प्रकारचे प्रकल्प शहरी किंवा कमी लोकसंख्येच्या, सध्या वापरात नसलेल्या औद्योगिक भागांमध्ये होऊ शकतात. मात्र, ग्रामीण शेतीप्रधान क्षेत्रावर बळजबरीने लादणं अन्यायकारक आहे.
प्रस्तावित विमानतळ प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा. प्रकल्पासाठी पर्यायी जागांचा खुला अभ्यास आणि लोकसहभागातून निर्णय घ्यावा. स्थानिक जनतेच्या मतांचा सन्मान करून कोणत्याही प्रकारचा बळजबरीचा निर्णय घेऊ नये. पर्यावरणास अनुकूल, शाश्वत विकासाचे पर्याय स्वीकारावेत. या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा व आमचा आवाज शासना दरबारी मांडावा. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा संघर्ष सुरू ठेवू, अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाचे वतीने खासदार संजय राऊत यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पुरंदर तालुका प्रमुख अभिजित जगताप, विमानतळ विरोधी शिष्टमंडळाचे पी. एस. मेमाणे, वनपुरी गावचे माजी सरपंच एकनाथ बापू कुंभारकर, गणेशशेठ मोरे, पारगावचे उपसरपंच चेतन दादा मेमाणे, छावा संघटनेचे मनेष हगवणे, उद्योजक बाळासाहेब कुंभारकर, राजुनाना कुंभारकर, उदाचीवाडी गावचे सदस्य विकास कुंभारकर उपस्थित होते.