Unseasonal Rain: अवकाळी पावसाच्या भीतीने वाल्हे परिसरात गहू काढणीला वेग; हार्वेस्टरकडे शेतकऱ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:00 IST2026-03-21T12:58:55+5:302026-03-21T13:00:58+5:30
- हातातोंडाशी आलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी मळणी करून धान्य घरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Unseasonal Rain: अवकाळी पावसाच्या भीतीने वाल्हे परिसरात गहू काढणीला वेग; हार्वेस्टरकडे शेतकऱ्यांचा कल
वाल्हे : परिसरात मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे वादळी वारे आणि मेघांची दाटी पाहून शेतकरी पावसाचा अंदाज घेत आहेत. परिणामी रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकांची काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, मका आदी रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आला आहे. हातातोंडाशी आलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी मळणी करून धान्य घरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
गतवर्षी वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, जिरायती भागातील पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मोठ्या मेहनतीने पिके जगविल्यानंतर आता अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यास काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सकाळपासून कडक ऊन पडत असताना, दुपारनंतर ढगाळ व दमट वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल होत आहे.
दरम्यान, गहू काढणीची पारंपरिक पद्धत आता हळूहळू कमी होत असून, आधुनिक यंत्रांच्या मदतीने कमी वेळात काढणी केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढणीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला असतानाच एप्रिल आणि मे महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सध्याच्या हवामान बदलानंतर पुढील काळात तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.