Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:21 IST2026-02-22T19:21:14+5:302026-02-22T19:21:43+5:30
- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी,

Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ
पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत पूर्वी शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून गेला होता; परंतु, विधिमंडळातील सध्याचे संख्याबळ पाहता आता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष दावा करत आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चवधरी, आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालत लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत असतो. तशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे राहतात. राज्यातील या ‘लुटारू’ सरकारने घोटाळ्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावे, श्वेतपत्रिका काढावी. महाविकास आघाडीच्या आजच्या अधिवेशनपूर्व बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर राहिले, हे माहिती नाही; परंतु, प्रत्यक्ष विधिमंडळात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही
मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला, त्या दिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. आज पोलिसांनी दिलेली सुरक्षाव्यवस्था त्या दिवशी का दिली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येत अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.