रिंगरोडच्या कामासाठी टाकलेला मुळा नदीतील भराव अखेर हटवला; पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:07 IST2026-03-13T19:07:04+5:302026-03-13T19:07:29+5:30
- कंपनीने नदीपात्रात भराव टाकताना संबंधित शासकीय विभागांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचेही निदर्शनास आले.

रिंगरोडच्या कामासाठी टाकलेला मुळा नदीतील भराव अखेर हटवला; पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत
कोळवण : मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथे रिंगरोडच्या कामासाठी मुळा नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला तात्पुरता भराव अखेर पाटबंधारे विभागाने हटवला. नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनीकडून नदीपात्रात भराव टाकून तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे नदीतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला गेला होता.
पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले होते. याचा फटका नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी, लघुउद्योग तसेच स्थानिक नागरिकांना बसत होता. तसेच कंपनीने नदीपात्रात भराव टाकताना संबंधित शासकीय विभागांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचेही निदर्शनास आले.
याप्रकरणी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पाठबंधारे विभागाने कारवाई करत हा भराव काढून टाकला. मागील दीड वर्षापासून पिरंगुट पाटबंधारे शाखा, पौड यांच्याकडून कंपनीला भराव हटवण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार व सूचना देण्यात येत होत्या.
धरणातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या उपबंधाऱ्यापर्यंत सुरळीत पोहोचावे, यासाठी ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता दिगंबर महादेव डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल गव्हाणकर, शाखा अभियंता किशोर चव्हाण तसेच कर्मचारी मयूर भुतडा, अरुण शिंदे आणि बाळू केदारी यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे मुळा नदीतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.