आरटीई अर्ज प्रक्रियेत दहा शाळांची अट; पण यादीत एकच पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:10 IST2026-02-27T20:04:37+5:302026-02-27T20:10:34+5:30
- एक किलोमीटर अंतराची अट आणि काही शाळांची नोंदणी न झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे.

आरटीई अर्ज प्रक्रियेत दहा शाळांची अट; पण यादीत एकच पर्याय
- उजमा शेख
पुणे :शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई ) २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा अर्ज करताना किमान दहा शाळांची निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज भरताना शहरासह ग्रामीण भागातील अनेक पालकांना अर्ज प्रणालीमध्ये केवळ एकच शाळा दिसत असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत अर्ज बाद ठरणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा किमान दहा शाळांची निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज भरताना अनेक पालकांना केवळ एकच शाळा पर्याय दिसत असल्याने अर्ज बाद ठरणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः एक किलोमीटर अंतराची अट आणि काही शाळांची नोंदणी न झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्य शिक्षण विभागाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी यंदा आरटीई अर्ज प्रक्रियेत बदल करताना ‘किमान दहा शाळांची निवड’ हा नियम लागू केला. विद्यार्थ्याच्या पत्त्यानुसार ऑनलाइन पोर्टलवर शाळांची यादी आपोआप उपलब्ध होते. १ किलोमीटर परिघातील शाळांना प्राधान्य देण्यात येते. मात्र काही भागांत या परिघात एकच शाळा असल्याने पर्याय मर्यादित राहतात. शिवाय काही खासगी शाळांनी यंदा आरटीई अंतर्गत नोंदणी न केल्याने त्या शाळा प्रणालीत दिसत नाहीत. त्यामुळे प्रणालीमध्ये पालकांना दहा पर्याय निवडण्याची संधीच मिळत नसल्याची तक्रार पालक करत आहे.
काय आहे अडचण?
अर्ज प्रणालीमध्ये विद्यार्थ्याच्या पत्त्यानुसार शाळांची यादी आपोआप दिसते.
१ किलोमीटर परिघातील शाळांना प्राधान्य दिले जाते.
त्या परिघात कमी शाळा असल्यास यादी मर्यादित राहते.
काही शाळांची आरटीई नोंदणी पूर्ण नसल्याने त्या यादीत दिसत नाहीत.
या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. “दहा शाळा निवडणे बंधनकारक आहे, पण आमच्या परिसरात एकच शाळा दिसते. आम्ही काय करायचे?” असा सवाल अनेक पालकांनी उपस्थित केला आहे.
अर्ज बाद होणार का?
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराच्या परिसरात प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या कमी असेल आणि प्रणालीत तितकेच पर्याय दिसत असतील, तर पालकांचा अर्ज केवळ दहा शाळा निवडल्या नाहीत म्हणून बाद होणार नाही.