हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही, शेतकऱ्यांनी वास्तव समजून घ्यावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:03 IST2026-02-05T10:02:11+5:302026-02-05T10:03:18+5:30
हार्वेस्टरमुळे उत्पादनात अवाजवी घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्याने उत्पादनात घट नाही, शेतकऱ्यांनी वास्तव समजून घ्यावे
पुणे : उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत ही जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कापणी ही केवळ आधीच तयार झालेल्या उसाची तोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रतिएकरी सुमारे १५ टन ऊस उत्पादनात घट होते, हे वास्तवाला धरून नाही. हार्वेस्टरमुळे उत्पादनात अवाजवी घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.
हार्वेस्टरमुळे उत्पादनात घट प्रत्यक्षात कापणीदरम्यान होणारी हानी असते. ही हानी प्रामुख्याने शेतजमीन समतल नसणे, शिफारसीनुसार ओळीतील अंतर नसणे, ऊस आडवा पडलेला असणे, बेस कटरची उंची चुकीची असणे, अपुरी ओलावा स्थिती, प्रशिक्षित ऑपरेटरचा अभाव यामुळे होते. ही सर्व कारणे व्यवस्थापनाशी संबंधित असून हार्वेस्टर तंत्रज्ञानातील दोष नाहीत. भारतीय कृषी संशोधन संस्था, राज्यातील कृषी विद्यापीठे व साखर कारखान्यांच्या अभ्यासानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी साधारण २ ते ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने केलेल्या कापणी इतकीच आहे.
प्रतिएकर १५ टन उत्पादन घट होणे, हे वैज्ञानिकदृष्ट्या अवास्तव व अप्रमाणित आहे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये ९५ ते १०० टक्के यांत्रिक कापणी केली जाते. आणि तरीही तेथे ऊस उत्पादन व साखर उतारा हा भारतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे हार्वेस्टर ही श्रम बचत, वेळेवर कापणी करणारे व शाश्वत तंत्रज्ञान आहे. योग्य शेत तयारी, योग्य पीक रचना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असल्यास यांत्रिक कापणीमुळे उत्पादनात कोणतीही घट होत नाही.
यांत्रिक कापणी ही श्रम बचत करणारी, वेळेची बचत करणारी व शाश्वत शेती पद्धत आहे. मात्र तिची यशस्वी अंमलबजावणी योग्य शेततयारी, योग्य ओळीतील अंतर आणि प्रशिक्षित मनुष्यबळावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वैज्ञानिक व प्रमाणित माहितीवर आधारित निष्कर्ष काढावेत, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.