राज्यसरकारने राेहित पवार यांना सुरक्षा द्यावी;खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:33 IST2026-02-20T10:33:09+5:302026-02-20T10:33:34+5:30
- खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाही.

राज्यसरकारने राेहित पवार यांना सुरक्षा द्यावी;खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना तीव्र असून आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण काही तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. रोहित पवार अस्वस्थ असून, त्यांची काळजी वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाही. दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य पुढे आले पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जय पवार यांनीही केली आहे. जयने जे स्टेटस ठेवलं त्याच्या मनात अस्वस्थता आहे. जय, पार्थ, वहिनी आणि लाखो लोक ज्यांच्या मनात अस्वस्थ प्रश्न आहेत. पार्थ आणि जयसाठी अजितदादांचा अपघात हा मोठा धक्का आहेच. आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे असंच नाही, आमच्यावर प्रेम करणारे सगळेच या दुःखात एकत्र आहेत. दादाची स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे.’
दोन्ही 'राष्ट्रवादी' विलीन करण्याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘मुंबईत झालेल्या बैठकीला मी नव्हते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भूमिका मांडली आहे. माझा भाऊ गेला. त्याचे दु:ख आयुष्यभरातील भरून येणार नाही. आमचा कुटुंबप्रमुख राहिला नाही, तर आता कोणाबरोबर खरे-खोटे करत बसायचे? आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा होती. आता या गोष्टीला पूर्णविराम द्यावा. वास्तव काय आहे, हे मला आणि अजित पवार यांना माहीत होते.’ मंत्रालयात मंत्र्याच्या दालनात लाच स्वीकारल्याच्या प्रकरणाबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘या प्रकरणाची चौकशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे. कारवाई करण्यात आलेल्या इमारतीचे आणि गृह खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस हे आहेत. त्यामुळे यांनी उत्तर दिले पाहिजे, गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून उत्तर द्यावे.’