प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 09:58 IST2025-05-30T09:58:29+5:302025-05-30T09:58:29+5:30
बाधित सात गावांपैकी एखतपूर-मुंजवडी ग्रामस्थांचा धाडसी निर्णय, बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्याची मागणी

प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन
सासवड :पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. त्यामध्ये पर्याय देण्याचे महसूलमंत्र्यांनी सुचविले होते. त्या अनुषंगाने एखतपूर आणि मुंजवडी या गावांची ग्रामसभा झाली. त्यामध्ये एकरी १० कोटी रुपये द्यावेत. त्याचबरोबर विमानतळाच्या परिसरातच ३५ टक्के विकसित भूखंड द्यावा, त्याचा एफएसआय ५ असावा. बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किंमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा व तसेच व्यावसायिक भूखंडाच्या बदलत्या भूखंड व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा. अशा प्रकारच्या मागण्या शासनासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत एखतपूर - मुंजवडी अंतर्गत मौजे एखतपूर व मौजे मुंजवडी गावचा समावेश आहे. मौजे एखतपूर मधील २१६.२८० हे. क्षेत्र व मौजे मुंजवडी येथील १२९.३२३ हे. क्षेत्र संपादित होणार आहे. बाधित सात गावांपैकी एखतपूर मुंजवडी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी काही अटींवर जमिनी देण्याबाबत धाडसी निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामसभेला एखतपूर गावच्या सरपंच शीतल टिळेकर, उपसरपंच तुषार झुरंगे, माजी सरपंच कृष्णासेठ झुरंगे, ग्रामपंचायत सदस्य विद्या झुरंगे, सोनल झुरंगे, माणिक निंबाळकर, पोलीस पाटील बंडू धिवार, मुंजवडी गावच्या पोलीस पाटील कविता झुरंगे, स्वप्निल टिळेकर, मुरलीधर झुरंगे, उदाचीवाडी गावचे संतोष हगवणे, ग्रामसेवक अजित जगताप, शांताराम मोरे, नारायण भामे , किसन टिळेकर, महादेव टिळेकर, लक्ष्मण झुरंगे, सुहास भामे, विशाल धिवार, संकेत मोरे, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सरकारसमोर मांडलेल्या अटी
रोख परतावा १० कोटी प्रति एकर एकरकमी व बाधित क्षेत्राच्या ३५% विमानतळ हद्दीमध्ये भूखंड देण्यात यावा व त्याचा ५ एफ एस आय असावा.
प्रकल्पात येणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय किंवा खासगी आस्थापनावरती कुशल व अकुशल स्वरुपाच्या नोकऱ्या व रोजगाराच्या संधी बाधित भूमिपत्रांना व त्यांच्या वारसांना देण्यात याव्या.
शासकीय नोकरीत व शिक्षणात गुणवत्तेवर आधारित आरक्षण व प्रकल्प ग्रस्त असल्याचे दाखले बाधित भूमिपत्राने देण्यात यावे.
बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा व तसेच व्यावसायिक भूखंडाच्या बदलत्या भूखंड व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा.
प्रकल्प बाधित क्षेत्राचा मोबदला देताना सरसकट किंमत ठरविण्यात यावी, त्यामध्ये जिरायती / बागायती याबाबी विचारात घेऊ नये.
जमीन भूसंपादन प्रक्रिया एमआयडीसीकडे न देता इतर शासकीय संस्थेकडे देण्यात यावी.
पीपीपी तत्त्वावरही मोबदला बाधित शेतकऱ्यांना मिळावा
बाधित गावामध्ये फळबागाचे प्रमाण ज्यादा असल्याने झाडाचे मूल्यांकन करताना झाडाचे वयोमान, सरासरी उत्पन्न व बाजार दर यांचा प्रामुख्याने विचार व्हावा.
सात गावांमधून आतापर्यंत १७९० हरकती
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावांमध्ये केंद्र शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित असून, यासाठी २८३२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नोटीस देऊन आणि जमिनीवर शेरे मारून कित्येक दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांकडून हरकती मागविण्याबाबतही नोटीस देण्यात आल्या होत्या. सात गावांतील शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने तयारी करत हरकती नोंदविल्या आहेत. सात गावांमधून आतापर्यंत १७९० हरकती नोंदविल्या आहेत. यात सर्वाधिक हरकती पारगावातून ६५१, एखतपूर ६४, मुंजवडी ५५, खानवडी १९९, वनपुरीमधून ३६०, कुंभारवळण ३३३ आणि उदाचीवाडीमधून १२८ हरकती, अशा १७९० हरकती आल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
भूसंपादनाबाबत येत्या २९ मेपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत होती. त्यानुसार १७९० हरकती आल्या असून त्यावर पुरंदर उपविभागीय अधिकारी कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती नोंदविण्यासाठी वनपुरी ग्रामपंचायतीने आणखी १० दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाकडे मागितली आहे, असे भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे यांनी सांगितले.