अवकाळी पावसाच्या शक्यतेने इंदापूर परिसरात शेतकरी धास्तावले; गहू काढणीसाठी धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:05 IST2026-03-22T11:03:58+5:302026-03-22T11:05:21+5:30
गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली

अवकाळी पावसाच्या शक्यतेने इंदापूर परिसरात शेतकरी धास्तावले; गहू काढणीसाठी धावपळ
कुरवली : इंदापूर तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या गहू पीक काढणीच्या टप्प्यावर आले असून अचानक पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. गव्हाची काढणी करून सुरक्षित साठवण करण्यासाठी अनेक शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र, वेळेअभावी अजूनही मोठ्या प्रमाणात पीक शेतात उभे आहे.
दरम्यान, मळणी यंत्रांच्या (थ्रेशर) दरातही मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी प्रति एकर दोन हजार रुपये असलेले दर आता तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आधीच हवामानाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे दाणे ओलसर होऊन गुणवत्तेत घट येण्याची शक्यता आहे, तसेच काढणी केलेले पीक भिजल्यास मळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याबाबत शेतकरी दादा माने म्हणाले की, सध्या गहू पिकाचा उतारा सरासरी एकरी वीस क्विंटल मिळत असून बाजारात क्विंटलला सुमारे २२०० ते २५०० रुपये दर मिळत आहे.